गुरुवार, २१ ऑगस्ट, २०१४

'पोश्टर बॉइज्' एक इरसाल ईनोदी सिनेमा





पोश्टर बॉइज् हा चित्रपट गेल्या आठवड्यात मित्रांसोबत पाहिला. वेगळा विषय आणि दमदार कलाकार यामुळे हा चित्रपट पाहण्यसाठी चित्रपटगृहात गेलो. चित्रपटाची विषय मुळातच नसबंदी सारख्या गंभीर विषयावर असला तरी दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या समीर पाटील यांनी या विषयाला रंजक आणि विनोदी पद्धतीने सादर केला आहे. नसबंदीवर विनोद करताना तो विनोद कमरे खालचा होऊ न देता विनोदाची सीमारेषा जपली आहे याचे श्रेय लेखक आणि दिग्दर्शकाला द्यावे लागेल. चित्रपटाची कथा एका गावातील जत्रेत सुरु होते. या जत्रेच्या आनंदानंतर गावचे प्रतिष्ठित गृहस्थ जगन देशमुख ( दिलीप प्रभावळकर), शाळा मास्तर सदानंद कुलकर्णी ( ऋषिकेश जोशी) आणि गावातला एक अवली तरुण अर्जुन जगताप(अनिकेत विश्वासराव) यांच्यावर जणु काही आभाळच कोसळते. जगन देशमुखांच्या मुलीचा साखरपुडा मोडतो, सदानंद कुलकर्णींची बायको घर सोडून जाते आणि अर्जुनचे लग्न मोडते. ही आफत कशामुळे ओढवली आहे याचा थांगपत्ता या तिघांनाही नसतो. ते या प्रकरणाचा शोध घेतात तेव्हा त्यांना धक्का बसतो की त्यांचे फोटो सरकारच्या बिनटाका नसबंदीच्या पोश्टरवर त्यांना न विचारता लावण्यात येतात. यानंतर हे तिघे कशाप्रकारे लढा देतात याची गमतीशीर गोष्ट म्हणजे पोश्टर बॉइज्.
       कुलकर्णी मास्तर मुलांना त्सुनामी शिकवत असताना त्यांची बायको शाळेत येऊन मी घर सोडते आहे असे सांगते हा प्रसंग तसेच जगन आबा एका मातारीला आजीबाई म्हणतात तेव्हाचा प्रसंग अशा  कथेतील विनोदाच्या पेरणीमुळे चित्रपट पाहताना आपल्याला कंटाळा येत नाही. दिलीप प्रभावळकर, ऋषिकेश जोशी यांनी दर्जेदार अभिनय केला आहे. या चित्रपटात सरप्राइज पॅकेज ठरला आहे तो अनिकेत विश्वासराव. गावातील अवली पण तितकाच हळव्या मनाचा तरुण   त्याने ज्याप्रकारे साकारला आहे त्याला तोड नाही. नेहा जोशीने साकारलेली मास्तरची भांडखोर बायको, अर्जुनची कल्पु डार्लिंग असलेली पुजा सावंत, यांनी आपल्या भुमिकेला न्याय दिला आहे. उद्य सबनीस,भारत गणेशपुरे,नेहा बुगडे आणि इतर कलाकारांनी  चित्रपटात चांगला अभिनय केला आहे.
       अशा चित्रपटाची निर्मिती करण्याच धाडस श्रेयस तळपदेने दाखवले याबद्दल त्याचेही कौतुक. पुष्पांक गावडेच्या सिनेमॅटोग्राफीचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. लेझी यांच्या संगीतही चित्रपटास साजेस आहे. चित्रपटाचे प्रमोशनल साँग तर सर्वांच्या ओठावर रुळल आहे. क्षण हे आणि देवा देवा ही गाणीसुध्दा श्रवणीय आहेत. एकंदर तद्दंन चित्रपटापेक्षा काहीसा वेगळा विषय आणि त्याची विनोदी पध्दतीने केलेली हाताळणी यामुळे पोश्टर बॉइज् नक्कीच स्मरणीय ठरतो.     

शनिवार, २८ जून, २०१४

करो या मरो...







                          आज उपउपांत्यपूर्व फेरीची   (प्री क्वाटर फायनल) सुरवात होणार आहे  फुटबॉल विश्वचषकाचा हा  उत्तरार्ध आहे. आता खऱ्या अर्थाने फुटबॉल विश्वचषकाला रंगत येईल कारण सर्वोत्तम सघ एकमेकांसमोर उभे टाकतील यामध्ये  जो जिंकेल तो पुढच्या फेरीत आणि ज्याच्या वाटी 'पराभव' तो परतीच्या वाटेवर. ३२ संघांपैकी १६ संघ या फेरीसाठी पत्र ठरले आहे.या विश्वचषकात पोर्तुगाल,स्पेन,इंग्लंड आणि इटली या दादा सघांवर साखळी फेरीतच गाशा गुडाळायची वेळ आली. कोस्टा रिका,चिली आणि अल्जेरिया या संघांनी नामी संघाना धक्का देत पहिल्यांदाच बाद फेरी गाठली आहे.
                         बाद फेरीचा पहिला सामना  यजमान आणि पाच वेळा विश्वचषक विजेत्या ब्राझीलचा गतविजेत्या स्पेनला धक्का देणाऱ्या चिलीशी होणार आहे. ब्राझीलच या सामन्यात पारड जड वाटत असल तरी जायंटकिलर चिली ला कमी लेखता येणार नाही.ब्राझीलच्या युवा फुटबॉलपटू नेयमारवर साऱ्या जगाचे लक्ष लागून आहे नेयमार सध्या फोर्मात असल्याने त्याचाकडून चाहत्यांच्या अपेक्षा आहेत.
                        दुसरा सामना आहे उरुग्वे आणि कोलंबियात  चावऱ्या  सुआरेझवर बंदी आणल्याने   उरुग्वे संघाची ताकद कमी झाली आहे याचा फायदा कोलंबिया उठवून अजून एक धक्का देते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
                        आज पासून विश्वचषकातील रोमहर्षक आणि श्वास रोखून धरणाऱ्या लढतींना आरंभ होईल. त्यामुळे फुटबॉल रसिकांसाठी आजपासून प्रत्येक सामना महत्वाचा असेल यात काही शंका नाही. 

शनिवार, १७ मे, २०१४

अब अच्छे दिन आ गये है…





                                 

                      नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेत भाजपा आणि एनडीएला अभूतपूर्व यश मिळाल आहे.गेल्या दहा वर्षात केलेले घोटाळे,भ्रष्टाचार यामुळे  काँग्रेसला जनतेने अस्मान दाखवले. नरेंद्र मोदींची  लाटही एवढी विशाल होती की कॉंग्रेसला पन्नाशीही पार करता आली नाही. तब्बल ७ राज्यांमध्ये भाजपने पूर्ण बहुमत  प्राप्त केले यावरूनच देशातील  वातावरण मोदींमय झाल्याचे दिसून येते.महाराष्ट्रामध्ये महायुतीने  काँग्रेस आणि राष्ट्रवादीला चारीमुंड्याचीत केले. सत्तेची आणि पैशाची मस्ती चढलेल्या बड्या नेत्यांना  लोकांनी त्यांची जागा दाखवून दिली. यावेळी देशात आणि  महाराष्ट्रात इतर कोणताही फॅक्टर चालला नाही इथे फक्त मोदी  फॅक्टर चालला त्यामुळे या  निवडणूक निकालावरून अस वाटत आहे कि  अब अच्छे दिन आ गये है  

सोमवार, २४ मार्च, २०१४

आज लागी लागी नई धूप










               'आखो देखी' या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी टीव्हीवर पाहिला होता. ट्रेलरवरूनच हा चित्रपट वेगळा असेल असे वाटत होते आणि आज हा चित्रपट पाहिल्यावर खरच या चित्रपटाची वाट वेगळी आहे. आपण अनेक चित्रपट रोज पाहतो परंतु आखो देखी सारखे अंतर्मुख करणारे चित्रपट फार कमी असतात. दिल्लीतील एकत्र कुटुंबातील मुख्य 'बाबूजी' एका घटनेने  जे  मी स्वतःच्या डोळ्याने बघतो तेच खरे ,ज्याचा मी अनुभव घेतो तेच सत्य असा निर्णय घेतात आणि त्यानंतर प्रत्येक गोष्ट त्यांना नव्याने उलगडते  अशी चित्रपटाची कथा. चित्रपटातील संवादही जमेची बाजू आहे सर्व कलाकारांनी उत्तमरित्या अभिनय केला आहे परंतु बाबूजी (संजय मिश्रा )आणि त्याची पत्नी (सीमा पावा) यांचा अभिनयाला खऱ्या अर्थाने  दाद द्यावीशी वाटते.वाघाची डरकाळी ऐकण्यासाठीचा प्रसंग भलताच विनोदी झाला आहे. चित्रपटच संगीतही साजेस आहे  'आज लागी नयी धूप' हे गाण मनाला स्पर्शून जात.  जुन्या दिल्लीतील घरे ,तेथील वातावरण हे चित्रपटात अप्रतिमरित्या दाखविले आहे. मुख्य म्हणजे हा चित्रपट आपल्याला  अंतर्मुख करण्यास भाग पाडतो यातच  दिग्दर्शक रजत कपूर याचं  यश आहे. 

शनिवार, १६ नोव्हेंबर, २०१३

सचिन, तू जग जिंकलस ...



कॅप्शन जोडा
ज्या खेळाडूने तब्बल २४ वर्षे भारतीयांच्याच नव्हे तर जगभरातील क्रिकेटरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं त्या मास्टर ब्लास्टर सचिन रमेश  तेंडूलकरने क्रिकेटला आज अलविदा केले. आज असा एकही क्रिकेटरसिक नसेल त्याच्या डोळ्यात पाणी आले नाही. सचिन क्रिकेटमध्ये नसणार आणि 'सचिन' 'सचिन' हा जयघोष स्टेडीयमवर घुमणार नाही  हि कल्पनाही करता येत नाही. श्वास आणि शरीराचे जसे नाते असते तसे तुझे  आणि क्रिकेटचे नाते आहे. सचिन खरच तू 'क्रिकेटचा देव' आहेस  याशिवाय काही शब्द नाहीत.या देवाला माझा  साष्टांग नमस्कार . ज्या खेळाडूने भारताचे नाव जगभरात रोशन केले अशा सचिनला सरकारने भारतरत्न जाहीर करून त्याच्या कारकिर्दीचा खऱ्या अर्थाने गौरव केला आहे.  

शनिवार, २१ सप्टेंबर, २०१३

जीवा लावी गोडी अशी नारबाची वाडी


होय महाराजा… 


                            नारबाची वाडी हा चित्रपट आज पाहिला. दिलीप प्रभावळकरांचा  सहज सुंदर अभिनय आणि गुरु ठाकूर यांच्या संवादाने चित्रपट मनाला भावतो. सर्व इतर कलाकारांनीही अभिनय उत्तम केला आहे. कोकणचे सौंदर्य आणि मालवणी कोकणी भाषेमुळे चित्रपटाला गोडवा प्राप्त झाला आहे. कथेची मांडणी अतिशय साधी सरळ आहे.हा चित्रपट पाहिल्यावर कुठे तरी अस वाटत सारखे सारखे सस्पेंस आणि वेगळ करण्याच्या नादात आपण साधेपणा विसरतो. साधेपणातहि मजा असते. ती रंजकता या चित्रपटातून दिसते. 'शबय शबय' आणि 'गझाल खरी काय' हि  चित्रपटातील  गाणीहि गुणगुणावीशी वाटतात. माणसाची प्रवृत्ती आहे  की जरी त्याच्याकडे सर्व असेल तरी त्याला  समाधान नसते सतत त्याला कुठल्या न कुठल्या गोष्टीचा हव्यास असतो आणि  याच लोभी वृत्तीवर चित्रपटातून भाष्य केल आहे. त्यामुळे हा चित्रपट माझ्या आवडत्या चित्रपटांत येतो.          



शुक्रवार, १९ जुलै, २०१३

तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल ...



     आज  आषाढी एकादशी सारा  महाराष्ट्र भक्तिरसात  दंग झाला आहे. वारकरी आपल्या पांडुरंगाच्या भेटीने तृप्त झालेत. पुरोगामी महाराष्ट्रातील  वारीची परंपरा हि  ७०० वर्षे जुनी आहे. वारीमध्ये येणारी प्रत्येक व्यक्तीहि वारकरी असते येथे जात-पात,गरीब-श्रीमंत,स्त्री-पुरुष असा भेदभाव केला जात नाही.वारीमधील वारकऱ्यांची शिस्तबद्धता थक्क करणारी आहे.   वारकरी संप्रदायातून मानवतेचा प्रचार आणि प्रसार केला जातो. विठ्ठल नामाचा जप करत  वारी  एकादशीला पंढरपुरात येतात. आजच पंढरपुरातील वातावरण विलोभनीय अस असत. चंद्रभागेच्या पात्रामध्ये स्नान करून वारकरी आपल्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन आणि या सोहळ्याचे क्षण डोळ्यात ठेऊन परतीच्या प्रवासाला लागतात. या वारीचे  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जडण घडणीत महत्वाचे स्थान आहे.

सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेछा
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल