रविवार, १३ ऑगस्ट, २०२३

आशियाई चॅम्पियन भारतीय संघ व्हावा विश्व चॅम्पियन

आशियाई चॅम्पियन, चक दे इंडिया 

चैन्नई मध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियन चषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय हॉकी संघाने ४-३ ने मलेशियाला नमवत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी वर नाव कोरले. सामन्यामध्ये १६ मिनिटे शिल्लक असताना मलेशिया ३-१ ने पुढे होती मात्र पुढच्याच मिनिटाला भारताने २ गोल करत जबरदस्त कमबॅक केला आणि सामन्यात ३-३ अशी बरोबरी केली. शेवटच्या सत्रात आकाशदिप सिंगने ४ था गोल करत भारतीय संघाला शानदार विजय संपादन करुन दिला. भारतीय संघाचा पहिला गोल पेनल्टी कॉर्नरवर जुगराज सिंगने केला.त्यानंतर दुसरा गोल पेनल्टी स्ट्रोकवर कर्णधार हरमनप्रीत सिंगने केला. सामन्यातील तिसरा अत्यंत महत्त्वाचा गोल गुरजंट सिंगने केला हा गोल भारतीय संघातील सुंदर ताळमेळीचे एक उदाहरण होते. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे अतिंम सामन्यात भारताने पिछाडीवरुन आघाडीवर येत सामना जिंकला. यावरुनच भारतीय संघाची लढण्याची, हार न मानण्याची मानसिकता कळते.ही मानसिकता कोणत्याही संघासाठी जास्त महत्वाची असते.

या स्पर्धेत भारत अपराजित राहत पाकिस्तान, दक्षिण कोरिया, मलेशिया, जपान, चीन याच्यावर विजय मिळविला. यावरुनच स्पर्धेत पूर्णपणे भारतीय संघाने वर्चस्व केले हेही लक्षात येते. कर्णधार हरमनप्रीत सिंगने स्पर्धेत ९ गोल करत चषक विजयात सिंहांचा वाटा उचलला. युवा लोकल बॉय कार्ती सेलवम, उपकर्णधार हार्दिक सिंग, श्रीजेश, पाठक, मनदीप सिंग आणि निलकंठ शर्मा यांची स्पर्धेतील कामगिरी उल्लेखनीय होती. चेन्नईच्या प्रेक्षकांनीही स्पर्धेत भारतीय संघाला दिलेला पाठिंबा कौतुकास्पद होता. अंतिम सामन्यात जेव्हा भारत पिछाडीवर होता त्यावेळी भारताच्या प्रत्येक आक्रमणाला प्रेक्षकांनी पाठिंब्याची धार दिली त्यामुळे चषक जिंकण्यासाठी प्रेक्षकांचा पाठिंबा खुप महत्वाचा ठरला.


अंतिम लक्ष्य ऑलिंपिक

२०२१ मध्ये ऑलिंपिकमध्ये हॉकी संघाने तब्बल ४१ वर्षांनंतर पदक जिंकून हॉकीला नवसंजीवनी दिली . त्यानंतर भारतात झालेल्या विश्वचषकात भारतीय संघ विजेतेपदाचा दावेदार होता मात्र घरच्या मैदानावर महत्वाच्या सामन्यात निराशाजनक कामगिरी केल्याने  ९ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. हा पराभव जिव्हारी लागणारा होता. या पराभवामुळेच हॉकी इंडियाने फुल्टोन यांची प्रशिक्षकपदी नेमणूक केली. फुल्टोन प्रशिक्षक म्हणून नेमणूक झाल्यानंतर भारताने जिंकलेले हे मोठे विजेतेपद आहे. आता लक्ष्य आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करण्याचे असेल कारण या स्पर्धेत जर आपण सुवर्णपदक जिंकलो तर थेट ऑलिंपिक साठी पात्र होऊ.ज्यामुळे पुढील वर्षात होणाऱ्या पॅरिस ऑलम्पिकच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल. कारण अंतिम लक्ष्य हे ऑलम्पिक मध्ये सुवर्ण कामगिरी करणे हेच असणार आहे. 

जागतिक हॉकी मध्ये वाढता दबदबा.

एक आनंदाची बाब म्हणजे आज भारतीय संघ वर्ल्ड रॅंकिंग मध्ये तिसऱ्या क्रमावर पोहचला आहे. गेल्या दोन दशकातील सर्वोत्कृष्ट क्रमांक भारतीय संघाने मिळवला आहे. तसेच गेल्या दोन वर्षात भारतीय संघ नेहमी वर्ल्ड रँकिंग मध्ये पहिल्या पाच संघात राहिला आहे. त्यामुळे भारतीय संघाचा जागतिक हॉकी मध्ये वाढता दबदबा दिसून येतो. जर या सर्वाचे योग्य निरीक्षण करुन विचार केल्यास भारतीय हॉकी संघ एक उज्ज्वल भविष्याच्या दिशेने जात आहे आणि भारताचा असणारा हॉकीचा सुवर्ण इतिहास पुन्हा साकारणे हेच उद्दिष्ट असणार आहे.

पुन्हा एकदा भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन.

येणाऱ्या सर्व स्पर्धांसाठी भारतीय संघाला हार्दिक शुभेच्छा 

दिल दो हॉकी को. चक दे इंडिया 🇮🇳