शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२२- यशस्वी भव:




आजपासून सुरू होत आहे आशियाई देशांमध्ये  खेळांचा महासग्राम आशियाई क्रीडा स्पर्धा २०२२. गेल्या वर्षी म्हणजे २०२२ साली होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा ही चीनमधील कोरोनाच्या निर्बंधांमुळे यावर्षी २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर यादरम्यान चीनमधील  हांगझोऊ शहरात होणार आहे. चीनमध्ये तिसऱ्यांदा ही आशियाई क्रीडा स्पर्धा आयोजित केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेचा प्रारंभ १९५१ साली भारतामध्ये झाला. यावर्षी होणारी ही स्पर्धा ही १९ वी आशियाई क्रीडा स्पर्धा आहे. 

भारताचा विचार केल्यास या स्पर्धेत आत्तापर्यंत सर्वात जास्त खेळाडूंचा सहभाग असणार आहे. तब्बल ६५० हून जास्त खेळाडू या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील. भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग ज्याच्या नेतृत्वाखाली गेल्या महिन्यातच आपण आशियाई चॅम्पियन चषक जिंकलो आणि ऑलिंपिक कांस्यपदक विजेती लवलीना बोरगोहेन हे दोघे देशाचे ध्वजवाहक असतील. आज २३ तारखेला स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन होईल. खरंतर १९ तारखेपासूनच अनेक खेळांची सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत तब्बल ४० खेळांच्या ६१ क्रिडाप्रकारांचा समावेश आहे तसेच ४८१ सुवर्ण पदकांकरिता ४५ देशातील १२ हजारांहून जास्त खेळाडू प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. 

सुवर्ण कामगिरीचे दावेदार


भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघ सुवर्ण पदकाचे दावेदार असतील. सुवर्णपदक जिंकून दोन्ही संघाला ऑलिंपिकमध्ये पात्र होण्याची सुवर्णसंधी आहे. गोल्डन बॉय नीरज चोप्रा, ऑलिंपिक रौप्य पदक विजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू, बॉक्सर लवलीना बोरगोहेन, निखत झरीन, बॅडमिंटनमध्ये पी व्ही सिंधू,  लक्ष्य सेन, सात्विक साईराज - चिराग शेट्टीची जोडी, एच एस प्रणॉय, कुस्ती मध्ये अंतिम पंघाल, ऑलिंपिक कांस्यपदक विजेता बजरंग, महिला आणि पुरुष कब्बडी संघ, धावपटू अविनाश साबळे, रिले संघ हे सर्व भारताचे सुवर्ण पदकाचे प्रबळ दावेदार असतील.नेमबाजीत नेमबाज सुवर्ण कामगिरी करतील. त्यासोबतच तिरंदाजी रोविंग, स्विमिंग, टेनिस,  आणि इतर स्पर्धांमध्ये ही भारतीय खेळाडू शानदार प्रदर्शन करतील.

या आशियाई क्रीडा स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे २०१४ नंतर पुन्हा एकदा क्रिकेटचा समावेशही या स्पर्धेत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भारताचे पुरुष आणि महिला दोन्ही संघ यामध्ये सहभागी होणार असून दोन्ही संघ सुवर्ण पदकाचे दावेदार असतील. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ऑनलाईन खेळांनाही आशियाई क्रीडा स्पर्धेत स्थान दिले असून  त्यामध्ये पब्जी, ई फुटबॉल , डोटा असे ही खेळ समाविष्ट आहे. 



 गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने ७० पदक जिंकली होती या स्पर्धेत त्याहून जास्त पदके जिंकण्याचा मानस असेल. गेल्या महिन्यातच आपण चंद्रावर यान उतरविणारा चौथा देश ठरलो. आपला देश जगातील ५ मोठी अर्थव्यवस्था आहे . देशाला महासत्ता होण्याचे वेध लागले आहेत. महासत्ता होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर व्हायला हवे. क्रिडा क्षेत्रात तर आपण खूप मागे आहोत पण चांगली बाब म्हणजे गेल्या काही वर्षांपासून खेळांना पोषक वातावरण निर्माण होते आहे. पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत त्या वाढविल्या पाहिजेत. दर दशकात आशियाई, राष्ट्रकुल स्पर्धा देशात आयोजित केल्या तर क्रिडापटूंना प्रोत्साहन मिळेल  आणि या स्पर्धांच आयोजन करुन जगाला आपली खेळातील आणि आयोजन करण्याची क्षमता दाखवता येईल.  आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा. यशस्वी भव:, चक दे इंडिया.

रविवार, १३ ऑगस्ट, २०२३

आशियाई चॅम्पियन भारतीय संघ व्हावा विश्व चॅम्पियन

आशियाई चॅम्पियन, चक दे इंडिया 

चैन्नई मध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियन चषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय हॉकी संघाने ४-३ ने मलेशियाला नमवत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी वर नाव कोरले. सामन्यामध्ये १६ मिनिटे शिल्लक असताना मलेशिया ३-१ ने पुढे होती मात्र पुढच्याच मिनिटाला भारताने २ गोल करत जबरदस्त कमबॅक केला आणि सामन्यात ३-३ अशी बरोबरी केली. शेवटच्या सत्रात आकाशदिप सिंगने ४ था गोल करत भारतीय संघाला शानदार विजय संपादन करुन दिला. भारतीय संघाचा पहिला गोल पेनल्टी कॉर्नरवर जुगराज सिंगने केला.त्यानंतर दुसरा गोल पेनल्टी स्ट्रोकवर कर्णधार हरमनप्रीत सिंगने केला. सामन्यातील तिसरा अत्यंत महत्त्वाचा गोल गुरजंट सिंगने केला हा गोल भारतीय संघातील सुंदर ताळमेळीचे एक उदाहरण होते. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे अतिंम सामन्यात भारताने पिछाडीवरुन आघाडीवर येत सामना जिंकला. यावरुनच भारतीय संघाची लढण्याची, हार न मानण्याची मानसिकता कळते.ही मानसिकता कोणत्याही संघासाठी जास्त महत्वाची असते.

या स्पर्धेत भारत अपराजित राहत पाकिस्तान, दक्षिण कोरिया, मलेशिया, जपान, चीन याच्यावर विजय मिळविला. यावरुनच स्पर्धेत पूर्णपणे भारतीय संघाने वर्चस्व केले हेही लक्षात येते. कर्णधार हरमनप्रीत सिंगने स्पर्धेत ९ गोल करत चषक विजयात सिंहांचा वाटा उचलला. युवा लोकल बॉय कार्ती सेलवम, उपकर्णधार हार्दिक सिंग, श्रीजेश, पाठक, मनदीप सिंग आणि निलकंठ शर्मा यांची स्पर्धेतील कामगिरी उल्लेखनीय होती. चेन्नईच्या प्रेक्षकांनीही स्पर्धेत भारतीय संघाला दिलेला पाठिंबा कौतुकास्पद होता. अंतिम सामन्यात जेव्हा भारत पिछाडीवर होता त्यावेळी भारताच्या प्रत्येक आक्रमणाला प्रेक्षकांनी पाठिंब्याची धार दिली त्यामुळे चषक जिंकण्यासाठी प्रेक्षकांचा पाठिंबा खुप महत्वाचा ठरला.


अंतिम लक्ष्य ऑलिंपिक

२०२१ मध्ये ऑलिंपिकमध्ये हॉकी संघाने तब्बल ४१ वर्षांनंतर पदक जिंकून हॉकीला नवसंजीवनी दिली . त्यानंतर भारतात झालेल्या विश्वचषकात भारतीय संघ विजेतेपदाचा दावेदार होता मात्र घरच्या मैदानावर महत्वाच्या सामन्यात निराशाजनक कामगिरी केल्याने  ९ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. हा पराभव जिव्हारी लागणारा होता. या पराभवामुळेच हॉकी इंडियाने फुल्टोन यांची प्रशिक्षकपदी नेमणूक केली. फुल्टोन प्रशिक्षक म्हणून नेमणूक झाल्यानंतर भारताने जिंकलेले हे मोठे विजेतेपद आहे. आता लक्ष्य आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करण्याचे असेल कारण या स्पर्धेत जर आपण सुवर्णपदक जिंकलो तर थेट ऑलिंपिक साठी पात्र होऊ.ज्यामुळे पुढील वर्षात होणाऱ्या पॅरिस ऑलम्पिकच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल. कारण अंतिम लक्ष्य हे ऑलम्पिक मध्ये सुवर्ण कामगिरी करणे हेच असणार आहे. 

जागतिक हॉकी मध्ये वाढता दबदबा.

एक आनंदाची बाब म्हणजे आज भारतीय संघ वर्ल्ड रॅंकिंग मध्ये तिसऱ्या क्रमावर पोहचला आहे. गेल्या दोन दशकातील सर्वोत्कृष्ट क्रमांक भारतीय संघाने मिळवला आहे. तसेच गेल्या दोन वर्षात भारतीय संघ नेहमी वर्ल्ड रँकिंग मध्ये पहिल्या पाच संघात राहिला आहे. त्यामुळे भारतीय संघाचा जागतिक हॉकी मध्ये वाढता दबदबा दिसून येतो. जर या सर्वाचे योग्य निरीक्षण करुन विचार केल्यास भारतीय हॉकी संघ एक उज्ज्वल भविष्याच्या दिशेने जात आहे आणि भारताचा असणारा हॉकीचा सुवर्ण इतिहास पुन्हा साकारणे हेच उद्दिष्ट असणार आहे.

पुन्हा एकदा भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन.

येणाऱ्या सर्व स्पर्धांसाठी भारतीय संघाला हार्दिक शुभेच्छा 

दिल दो हॉकी को. चक दे इंडिया 🇮🇳

रविवार, ३ जुलै, २०२२

*महिला हॉकी विश्वचषक २०२२*

क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची चर्चा सर्व भारतीयांमध्ये असते. आपण सर्व फुटबॉल विश्वचषक ही आवर्जून पाहतो त्यासाठी जागरण ही करतो. महिला हॉकी विश्वचषकाची तशी फारशी चर्चा माध्यमांमध्ये नाही आणि सामान्य क्रिडा प्रेमींमध्ये ही नाही ही खंत वाटते.  स्पेन आणि नेदरलँड्स येथे १ जुलै पासून महिला हॉकी विश्वचषक स्पर्धा सुरू झाली असून आज महिला भारतीय महिला हॉकी संघ इंग्लंडविरुद्ध सामना खेळत आपल्या विश्वचषक अभियानाची सुरुवात करणार आहेत.  हॉकी म्हटले की *चक दे इंडिया* हा चित्रपट आठवतो त्या चित्रपटातील संघानेही जबरदस्त कामगिरी करत विश्वचषक जिंकला होता आता ही संधी प्रत्यक्षात भारतीय संघाला आहे.

गेल्यावर्षी भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकत हॉकीला नवसंजीवनी दिली त्याच टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत  भारतीय महिला हॉकी संघाने अविश्वसनीय कामगिरी  करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. कांस्यपदकाच्या जवळ आले असताना ग्रेट ब्रिटनविरुध्द अटीतटीच्या लढतीत ३-४ असा पराभव झाला. मात्र राणी रांमपालाच्या नेतृत्वाखाली महिला संघाने केलेली कामगिरी अद्भुत होती. प्रधानमंत्री मोदींपासून सर्वसामान्य भारतीयांनी त्याचे कौतुक केले होते.

या विश्वचषकामध्ये गोलरक्षक सविताच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार असून ऑलिम्पिक सारखी अथवा त्यापेक्षा चांगली कामगिरी त्यांनी करावी याकरिता मनःपुर्वक शुभेच्छा. आपली जबाबदारी ही आहे की आपण सर्वांनी भारतीय संघाला पाठिंबा द्यायचा आहे. प्रत्येक सामन्याचे प्रसारण हे Star sports आणि Hotstar द्वारे केले जाणार आहे त्यावर आपणास सर्व सामने पाहता येईल आणि आपल्या भारतीय महिला हॉकी संघास पाठिंबा देता येईल.
भारतीय महिला हॉकी संघाने जबरदस्त कामगिरी करत विश्वचषक जिंकावा हीच इच्छा.

चक दे इंडिया 🇮🇳🇮🇳

शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२

महिलांच्या व्यक्तीमत्वाचे विविध कंगोरे उलघडवणारा 'झिम्मा'

 


आपण नेहमी बॉलिवूडमध्ये मल्टीस्टार एक्टर्सचा               (अभिनेत्यांचे)  चित्रपट पाहतो पण मराठी मध्ये मल्टीस्टार अभिनेत्रींना एकत्र घेऊन झिम्मा हा चित्रपट केला जातो आणि हा चित्रपट कोविड काळात ५० टक्के प्रेक्षक संख्या असतानाही  बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरतो यावरुनच जर आशय चांगला असेल तर तो चित्रपट चालतो हे मराठी प्रेक्षकांनी पुन्हा सिध्द केले आहे. आजच ॲमेझॉन प्राईमवरही हा चित्रपट रिलीज झाला आहे.  चित्रपटात ची कथा ही वेगवेगळ्या पार्श्वभूमी असलेल्या महिला युके ( ब्रिटन) टूरवर जातात कोणी वयाने लहान, कोणी आजी अशा वेगवेगळ्या वयोगटातील या महिला आहेत त्यांचा स्वभावही वेगवेगळा पण कशा पद्धतीने त्या या ट्रीपचा आनंद घेतात. स्वातंत्र्य अनुभवतात. तसेच त्यांच्यामध्ये होणारे रुसवे-फुगवे कशा सोडवतात हे सर्व या चित्रपटात दाखवलेले आहे. 

सुहास जोशी,निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी,  मृण्मयी गोडबोले क्षिती जोग,सायली संजीव यांनी आपल्या भूमिका उत्तम प्रकारे साकारल्या आहेत. सिध्दार्थ चांदेकरने साकारलेली 'गाईड'ची भूमिका त्याच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमेंनी छोट्या छोट्या प्रसंगांतून महिलांचे  व्यक्तिमत्त्व अतिशय सुंदर प्रकारे उलगडले आहे. पर्यटनावर चित्रपट असल्याने युकेतील महत्वाची पर्यटन स्थळे कॅमेराने छान टिपली आहेत. महिलांचे तेचतेच रडगाणे न दाखवता त्यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध कंगोरे उलघडवणारा हा 'झिम्मा' पाहिलाच पाहिजे .

सोमवार, १० जानेवारी, २०२२

पूष्पा, फ्लावर नही फायर है फायर...


पूष्पाराज मै झूकेगा नही साला..., पूष्पा फ्लावर नही फायर है फायर, असे जबरदस्त डायलॉग आणि हे डायलॉग बोलणारा जर स्टाइलीश स्टार अल्लू अर्जून असेल तर प्रेक्षक हा चित्रपट डोक्यावरच घेणार यात शंका नाही. मसाला चित्रपटांमध्ये साऊथ सिनेमाच्या तोडीस तोड चित्रपट बनविणे महाकठिण आहे हे पूष्पाने पुन्हा सिध्द केले आहे.  लहानपणापासूनच दुजाभाव, अवहेलना मिळालेला पूष्पराज एका प्रसंगी  निर्णय घेतो की तो कोणासमोर झुकणार नाही. मोठा झाल्यावर पूष्पा ( अल्लू अर्जून) मजूर असला तरी राजासारखा राहतो. बुध्दीचा आणि शक्तीचा वापर करुन मालकासोबत भागीदार बनतो. त्यादरम्यान पूष्पाचे अनेक शत्रू तयार होतात त्यांना अद्दल घडवितो. श्रीवल्ली (रश्मिका) या मुलीवर प्रेम करतो साऊथच्या अनेक चित्रपटापणे यातही प्रेम करताना नायकाची स्टाईल वेगळी आहे. पूष्पाला प्रेम मिळते का? पूष्पा शत्रूंवर विजय मिळवून पूढे जातो का? हे सर्व चित्रपटांमध्ये पाहता येईल. 

अल्लू अर्जूनला पडद्यावर पाहणे, त्याचा डांन्स, एक्शन, बसण्याची स्टाईल सर्वच कमाल आहे. अनेक तरुणांची क्रश रश्मिकानेही चांगले काम केले आहे. नायकाचे विरोधक ही जबरदस्त आहेत. चित्रपटातील गाणी ही ठेका धरणारी आहेत.  शेवटी पूष्पामध्ये  पुढील भागासाठी काही प्रमाणात उत्सुकता निर्माण केली आहे.  चित्रपटातील सीन आणि कॅमेऱ्याची फ्रेम ही केमिस्ट्री जूळून आली आहे. यासाठी दिग्दर्शकाचे आणि सिनेमेटोग्राफरचे कौतुक करावे तेवढे थोडेच. पूष्पा अल्लू अर्जूनसाठी एकदा तरी पाहिलाच पाहिजे असा हा 'पैसा वसूल' चित्रपट आहे. कोणत्याही स्टारचा चित्रपट पहिल्या आठवड्यात जबरदस्त चालतो आणि नंतर कमाई कमी होते. पूष्पा मात्र पहिल्या आठवड्यापेक्षा तिसऱ्या आठवड्यात जास्त कमाई करुन फ्लावर नाही फायर ठरत आहे. अनेक बड्या चित्रपटांसमोर झुकतही नाही आहे. आम्ही मित्रांनी (नीरव, दर्शन, उत्कर्ष आणि मी) हा चित्रपट काल पाहिला. विशेष म्हणजे उत्कर्षने मोबाईलवर दोनदा पाहिल्यावरही थिएटर मध्ये पाहण्यासाठी आला. क्रेझ म्हणतात ती हीच.


रविवार, ८ ऑगस्ट, २०२१

गोल्डन बॉय नीरज चोप्रा

 


कौन कहता है कि आसमां में सुराख नहीं हो सकता,         एक भाला तो तबीयत से उछालो यारों...! 

आज नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक  जिंकत वरील शेर सिध्द केला आहे.ट्रेक एण्ड फिल्ड प्रकारात भारताने ऑलिम्पिकमध्ये कधीच पदक जिंकले नव्हते. मात्र नीरजने अद्भुत कामगिरी करत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. आसमानमध्ये भाला फेकत सुवर्ण सुराख केला आहे. भारताला तब्बल १३ वर्षांनंतर ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळाले असून आज भारतीय तिरंगा ऑलिम्पिकमध्ये डौलाने फडकला. १३ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये भारताची राष्ट्रधून वाजली आणि सर्व भारतीयांना राष्ट्रधूनवर उभे राहून तिरंग्याला अभिवादन करता आले. हे यश, हा सुवर्णक्षण नीरजने भारतीयांना दिला आहे.

मिल्खा सिंग, पी.टी. उषा यांच पदक ०.१० सेकंद फरकाने गेले होते. आज मिल्खा सिंग यांना खरी श्रद्धांजली मिळाली आहे. स्वर्गात फ्लाइंग सिंखांच्या आनंदाला पारावार उरला नसणार. पी टी उषांही आनंदा अश्रूंनी हा विजय पहात असतील. जे स्वप्न असते ते सत्यात आणण्यासाठी नीरज सारखी मेहनत आणि आत्मविश्वास लागतो. तो आत्मविश्वास नीरजच्या सुवर्ण यशाने सर्व भारतीय खेळाडूंना आणि भारतीयांना नक्कीच मिळाला असणार. 

नीरज नावाचा अर्थ कमळ असाही होतो. भारताच्या ट्रेक एण्ड फिल्ड क्रिडा प्रकारातील भूतकाळ हा चीखल असून नीरजचे सुवर्णपदक हे सुवर्ण 'कमळ' आहे. आज नीरजच्या यशाने भारताने या ऑलिम्पिकमध्ये एकूण ७ पदके जिंकले आहेत.आतापर्यंत सर्वात जास्त पदक आपण टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत जिंकलो आहे. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी ज्या सुवर्णपदकाची आस साऱ्या भारतीयांना होती ते नीरजने जिंकत देशाला अनमोल भेट दिली आहे.  नीरजचे हे यश भारतातील क्रिडा क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात असावी आणि उत्तरोत्तर क्रिडा क्षेत्रात नीरजसारखे गुणवान खेळाडू तयार होवोत. भारत क्रिडा क्षेत्रात महासत्ता बनावा हीच इच्छा. नीरज तुझ्यावर कितीही लिहिले तरी कमीच पडेल. नीरज तुला मानाचा मुजरा.

सलाम नीरज. चक दे इंडिया. रंग दे तिरंगा 🇮🇳🇮🇳

गुरुवार, ५ ऑगस्ट, २०२१

अंधेरा हट गया, सुरज निकल गया, पदक मिल गया।




८ वेळा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारताला आज ४१ वर्षांनंतर हॉकीमध्ये पदक मिळाले आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने ५-४ ने जर्मनीचा पराभव करत कांस्यपदकावर नाव कोरले. ३-१ अशा पिछाडीवर असलेल्या भारताने सलग ४ गोल करत दमदार कमबॅक केला आणि जर्मनीला नेस्तनाबूत केले. 

साल २००८ भारत बीजींग ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होऊ न शकला नाही. त्यामुळे अनेक तज्ञांनी भारताच्या हॉकीला तिलांजली दिली होती.  २०२० टोक्यो ऑलिम्पिकच्या सुरुवातीला एका प्रख्यात वृत्तपत्राच्या वार्ताहराने भारतीय पुरुष संघाबद्दल ते मेडलचे दावेदार नाहीत असे म्हणत हिणवले होते. त्या सर्वांना आजचा पदकविजय हे जबरदस्त उत्तर आहे. हॉकी ही भारताची अस्मिता आहे. भारतीयांचे हॉकीशी भावनिक नाते आहे.जितके प्रेम या स्पर्धेत भारतीयांनी हॉकीवर दाखवले तेवढेच प्रेम कायम ठेवा हॉकीला सदैव समर्थन द्या. या विजयामुळे आज आपण खऱ्या अर्थाने हॉकीसाठी चक दे इंडियाचा जयघोष करत आहोत. भारतीय हॉकीवर गर्व आहे.


सलाम भारतीय हॉकी संघ. चक दे इंडिया. रंग दे तिरंगा 🇮🇳🇮🇳